मुंबई, दि. १९ : पद्मभूषण मेजर ध्यानचंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान देशव्यापी राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवातून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी घेण्याची एक संधी आणि प्रोत्साहन मिळेल, त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी राज्यातील युवा खेळाडू आणि सर्व नागरिकांना केले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा भावना आणि ऐक्याचा उत्सव असलेल्या राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाच्या आयोजनाबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत विविध राज्यांचे क्रीडा मंत्री, क्रीडा विभागाचे सचिव आणि अधिकारी सहभागी झाले होते. यावेळी मुंबई, मंत्रालय येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्याचे क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, उपसचिव सुनील पांढरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘विकसित भारत’ ही संकल्पना साकारण्यासाठी क्रीडा क्षेत्राची मोठी भूमिका आहे. खेळ ही केवळ मैदानी मर्यादा नसून आरोग्य, फिटनेस आणि राष्ट्रीय एकतेचे प्रतीक आहे. प्रत्येकाने मैदानी खेळ, योगा किंवा सायकलिंगमध्ये सहभाग घेऊन फिट इंडिया चळवळीत योगदान द्यावे. या क्रीडा उत्सवात सहभागी होऊन प्रत्येक नागरिकाने किमान एक तास खेळासाठी द्यावा, असे आवाहन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी
केले आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून देशात क्रीडा परिसंस्था उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
राज्यात तालुका स्तरावरील तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुणांनाही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी आणि प्रोत्साहन मिळेल. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यात अनेक क्रीडा योजना राबविल्या जातील. महाराष्ट्र राज्य हे खेळ आणि खेळाडूंमध्ये अव्वल स्थानी राहील, असा विश्वास क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला.
देशात मजबूत स्पोर्ट्स इको सिस्टम निर्माण करून २०३६ मध्ये ऑलिंपिकचे यशस्वी आयोजन हे शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंपर्यंत पोहोचणे, त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचे आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या क्रीडा महोत्सवात जिल्हा, विद्यापीठ, महाविद्यालय व स्टेडियम स्तरावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये क्रीडा स्पर्धा, वादविवाद व चर्चासत्रे, तज्ज्ञ आणि क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचा सहभाग असणार आहे. योग, बुद्धिबळासारख्या खेळांनाही यात प्रोत्साहन दिले जाणार आहे. तर ३१ ऑगस्ट रोजी देशभरात सायकलिंग उपक्रमाद्वारे सांगतासमारंभ पार पाडणार आहे.









